बिहार राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करा
ओबीसी सेल काँग्रेस कमिटीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
देसाईगंज-
देशात अलिकडे वन्य प्राण्यांसह पाळीव जनावरांची देखील गणना करण्यात आली. त्यानुसार नियोजन करून देशात कमी होऊ लागलेल्या जनावरांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले.माञ देशात राहणाऱ्या नागरीकांची जनगणना करण्यात येत नसल्याने नागरीकांना लोकसंख्येच्या प्रमाणात मुलभूत हक्क मिळत नसल्याने आर्थिक,मानसिक तसेच शारीरीक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.ही गंभीर बाब लक्षात घेता आपल्या राज्यातील नागरीकांना न्याय देण्यासाठी बिहार राज्यातील सरकारने जातनिहाय जनगणना सुरु केली आहे.त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही जातनिहाय जनगणना करून राज्यातील नागरीकांना न्याय देण्याची मागणी ओबीसी सेल काँग्रेस कमिटिच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की
राज्यातील नागरीकांची जातनिहाय जनगणना केली जात नसल्याने बहुसंख्य नागरींकांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिकार मिळत नसुन भारतीय राज्य घटनेनुसार आरक्षण मिळत नाही.ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असुन नागरीकांची आर्थिक,सामाजिक व शैक्षणिक स्थिती सुधारण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात वर्तमान स्थितीत आरक्षण देण्यावाचून पर्याय नाही.सदर बाब बिहार राज्य सरकारने लक्षात घेता आपल्या राज्यात जातनिहाय जनगणना सुरु केली आहे.त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात जातनिहाय जनगणना करून लोकसंख्येच्या प्रमाणात येथील नागरीकांना न्याय देण्यात यावा अशी मागणी ओबीसी सेल काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
निवेदन उपविभागीय अधिकारी यांचे प्रतिनिधी नायब तहसीलदार विलास तुपट यांनी स्विकारले.यावेळी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, सेवादल शहर अध्यक्ष भीमराव नगराळे,तालुका उपाध्यक्ष नितीन राऊत,माजी शहराध्यक्ष पिंकू बावणे,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पंकज चहांदे, माजी सभापती गणेश ढवळे, जेष्ठ काँग्रेस नेते तथा महासचिव मनोहर निमजे, गिरीधर कामटे सेवादल सचिव गिरीधद कामथे,नकुल नाकाडे आदी देसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते,ओबीसी बांधव उपस्थित होते.