पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेकडील ग्रुप ग्रामपंचायत मांडे- विठ्ठलवाडी येथे ७८ व्या स्वातंत्र्यदिनी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील इयत्ता पहिली ते पाचवी व इ. १० वी ते पदवीधर पर्यंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न झाला.
त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच मा. महेंद्र पाटील यांनी “देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे आहेत का ?” या डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या विचारांचे भाव स्पष्ट करताना सांगितले की देशाविषयीचा प्रत्येक चांगला विचार, कोणतेही सामाजिक कार्य म्हणजेच देशासाठी दिलेला वेळ होय. त्याचबरोबर दिनेश पाटील, दर्शना पाटील व राजेश पाटील यांनी आपले भाव व्यक्त केले. तसेच जि. प. प्राथमिक शाळेतील पहिली ते पाचवीच्या लहान बालकांनी आपल्या छोट्या छोट्या भाषणातून भारत माते विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
जि.प. शाळेच्या प्रत्येक वर्गातून प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. तसेच इयत्ता दहावी , बारावी व पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रसंगी उपसरपंच हर्षल भोईर, निवृत्त फॉरेस्ट अधिकारी संदेश पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष आदित्य पाटील, ग्रामसेवक प्रतीक्षा पाटील, नितेश पाटील, मोहन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्याचबरोबर विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनीही गर्दी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोदिनी पाटील मॅडम यांनी केले.